वलांडी | प्रतिनिधी
तालुक्यातील वलांडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी उपस्थित अफाट जनसमुदायाला संबोधित केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या तळागाळातील सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या विकासासाठी असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सत्तेत बसलेल्या भ्रष्टाचारी व जातीयवादी नेत्यांना आता सभागृहाच्या बाहेर काढण्याची वेळ आली असून, या संधीचा उपयोग सुजाण मतदारांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. वंचित बहुजन आघाडीला मतदानरूपी आशीर्वाद देऊन सामान्य कार्यकर्त्यांना सभागृहात पाठवा, अशी विनंती त्यांनी मतदारांना केली.
वंचित बहुजन आघाडी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना विकास व संघर्षासाठी संधी देते.
“एक संधी वंचितला” —
२४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी,
शेतमालाला हमीभाव,
प्रत्येक गावात आरोग्य केंद्र,
शेतकऱ्यांची कर्जमाफी,
जिल्हा परिषदेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी,
अशी विकासाची दिशा पक्षाने ठरवली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात वंचित बहुजन आघाडीने नगर परिषदांमध्ये १०६ नगरसेवक तर महानगरपालिकांमध्ये २८ नगरसेवक निवडून आणले असून, पक्षाचा राज्यभर झपाट्याने विस्तार होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
समारोप करताना त्यांनी वलांडी गटातील मनीषा गायकवाड, गणातील यासीन मुंजेवार, जवळगा गणातील भाग्यश्री जिरे,बोरोळ गणातील सूर्यवंशी रजनीकांत यांना गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेचे सूत्रसंचालन गणेश कांबळे यांनी केले. सभेदरम्यान सपोनि भीमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
























