लातूर | प्रतिनिधी
लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून दोन तरुणांनी मिळून एका तरुणावर चाकू व कोयत्याने अमानुष हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या घटनेत प्रज्वल उर्फ गोल्या संजय मस्के (रा. आनंदनगर, लातूर) याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी यांनी प्रज्वल मस्के याला अचानक अडवून एकाने चाकूने तर दुसऱ्याने कोयत्याने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात प्रज्वल मस्के गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळला. परिसरात रक्ताचे थारोळे साचल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. दरम्यान, काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन जखमी तरुणाला त्वरित रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी प्रज्वल मस्के याला मृत घोषित केले.
घटनेनंतर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काही तासांतच आरोपी गणेश गायकवाड व भीमा सूर्यवंशी यांना अटक केली. आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली चाकू व कोयता जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत प्रज्वल मस्के हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या लातूर जिल्हा विद्यार्थी आघाडीचा सचिव असल्याने या हत्येचे राजकीय पडसादही उमटले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून हत्येमागील नेमका हेतू, पूर्ववैमनस्य आणि इतर संभाव्य सहभागींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे लातूर शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
























