वलांडी/ प्रतिनिधी
२६ जानेवारी हा दिवस आपण गणतंत्र दिवस म्हणून राष्ट्रीय सणाच्या स्वरूपात साजरा करतो. याच अनुषंगाने यंदा आपल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आनंतवाडी येथे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, संविधानिक मूल्यांची ओळख निर्माण व्हावी आणि २६ जानेवारी हा सण आपण नेमका कशासाठी साजरा करतो याची जाणीव सर्वांना व्हावी या उद्देशाने संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात एकजूट अनुभव कट्ट्यातील युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतीय संविधानाची निर्मिती, उद्देशिका, मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. सहभागी स्पर्धकांनी उत्साहाने उत्तरे देत संविधानाबद्दलची आपली जाण अधिक दृढ केली.
या उपक्रमातून संविधान हे केवळ पुस्तक नसून आपल्या देशाच्या लोकशाहीचा पाया आहे, तसेच प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली.
या उपक्रमामुळे अनंतवाडी परिसरात संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून गणतंत्र दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
























