प्रतिनिधी / वलांडी
देवणी तालुक्यात शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर शांततेत व सुरळीत पार पडला.
मराठी विषयाला विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त राहावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
परीक्षा केंद्रावरील १२ परीक्षा हॉलमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा दक्ष पथकाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे (झूम ॲप कॅमेरा संदेश प्रणाली) थेट नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोणत्याही परीक्षा कक्षात संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखांना तत्काळ सूचना देऊन चौकशी व आवश्यक कारवाई केली जात आहे.
परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, सी.सी.टी.व्ही. नियंत्रण यंत्रणा, बैठे पथक, भरारी पथक व जिल्हा दक्ष पथक यांच्या समन्वयातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वर्षा घुगे-ठाकूर जिल्हाधिकारी यांनी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, अशा स्पष्ट व कठोर सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.
वलांडी येथील सौ. अनुसयादेवी सोनकवडे विद्यालय येथे दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र असून, या केंद्रावर सात विद्यालयांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्र क्रमांक ४१३६ वर एकूण २८७ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यामध्ये विष्णू डूब्बे हा एक दिव्यांग विद्यार्थी असून, दोन विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने २८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
केंद्रप्रमुख म्हणून राजेंद्र हजारे हे शासनाच्या नियमावलीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडत आहेत. या परीक्षा केंद्रावर १२ पर्यवेक्षक व २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बैठे पथक प्रमुख शेरसांडे आर. टी., सुतार डी. एम. (ग्रामपंचायत अधिकारी), करमले ज्ञानोबा (तलाठी), दायमी एस. एम. (विशेष शिक्षक) व प्रविण बेंडे (तंत्रस्नेही) यांनी ठाण मांडून परीक्षा प्रक्रियेवर काटेकोर देखरेख ठेवली.
सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या सततच्या निरीक्षणाखाली परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
























