प्रतिनिधी –वलांडी
देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या प्रक्रियेनंतर देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ११ उमेदवार, तर सहा पंचायत समिती गणांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले तरी माघारीनंतर लढतींचे स्पष्ट आणि निर्णायक स्वरूप समोर आले आहे.
देवणी तालुक्यातील बोरोळ जिल्हा परिषद गटात एकूण सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने आता केवळ दोन उमेदवार अंतिम लढतीत आमनेसामने उरले आहेत. या गटात गुणाले धोंडीराज किशनराज ( भाजपा) आणि पांचाळ औदुंबर रामदास ( राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष )यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत रंगणार असून या गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वलांडी जिल्हा परिषद गटात सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चार उमेदवार अंतिम रिंगणात उतरले आहेत. या गटात पाटील उषाबाई संभाजी (भारतीय जनता पार्टी), बिरादार जनाबाई तानाजी (शिवसेना – शिंदे गट), बेळकुने अंजली अजित (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) आणि गायकवाड मनीषा अविनाश (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात चौरंगी लढत होणार असून पक्षीय ताकद आणि स्थानिक प्रभाव यांचा कस लागणार आहे.
जवळगा जिल्हा परिषद गटात तब्बल तेरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने पाच उमेदवार अंतिम निवडणूक लढवणार आहेत. या गटात डगवाले विकास चनबस (राष्ट्रीय काँग्रेस), बिरादार विवेक दिलीप (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), भोसले सूर्यकांत नामदेवराव (शिवसेना – शिंदे गट), माने कालिदास शामराव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) शेरे रामलिंग शेषेराव (भारतीय जनता पार्टी) यांच्यात बहुकोनी आणि अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.
दरम्यान, देवणी पंचायत समितीच्या सहा गणांसाठीही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण १७ उमेदवार अंतिम यादीत आहेत. तळेगाव गणात चार उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता चामले प्रणिता रोहित (राष्ट्रीय काँग्रेस) आणि हंचनाळे अश्विनी सुनील (भारतीय जनता पार्टी) यांच्यात थेट लढत होणार आहे.
बोरोळ गणात आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. चार उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर पाटील प्रमोद मनोहर (भाजपा), बालूरे राहुल केशवराव (राष्ट्रीय काँग्रेस), बिरादार गजानन गोविंदराव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) सूर्यवंशी रजनीकांत व्यंकटराव (वंचित बहुजन आघाडी) हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
विळेगाव गणात आठ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता बोराळे विजयकुमार मल्लाप्पा (भाजपा) आणि सगर नागनाथ दत्तात्रय (राष्ट्रीय काँग्रेस) यांच्यात सरळ लढत होणार आहे.
वलांडी गणात तब्बल अकरा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर पाटील बाळासाहेब माधवराव (भारतीय जनता पार्टी), बिरादार उमेश अमृतराव (राष्ट्रीय काँग्रेस) मुंजेवार यासीन अखिलमिया (वंचित बहुजन आघाडी) हे तीन उमेदवार अंतिम लढतीत आहेत.
जवळगा गणात आठ उमेदवार वैध ठरले होते. चार उमेदवारांनी माघार घेतल्याने पाटोळे महादेवी शंकर (भाजपा), मोरे अर्चना दत्ता (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सोनकांबळे सुरेखा यशवंत (राष्ट्रीय काँग्रेस) जिरे भाग्यश्री गंगाधर (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
तर दवनहिप्परगा गणात चार उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाटील अंकिता सुशांत (भाजपा) आणि पाटील प्रभावती ज्ञानोबा (राष्ट्रीय काँग्रेस) हे दोन उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
एकूणच देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठीची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरी निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. पक्षीय ताकद, स्थानिक समीकरणे, विकासाचे मुद्दे आणि व्यक्तिगत संपर्क यावर ही निवडणूक अवलंबून राहणार असून देवणी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.
























