प्रतिनिधी | वलांडी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, ५ फेब्रुवारी रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या तब्बल ४८ तास अगोदर म्हणजेच आज रात्री १० वाजता प्रचार कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेनुसार कोणत्याही प्रकारच्या प्रचारास पूर्ण बंदी लागू होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मतदान होण्याच्या ४८ तास आधी जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार वाहने तसेच घराघरांत प्रत्यक्ष संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने आज, ५ फेब्रुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ३ गटांसाठी ११ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ६ गणासाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्ष व उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज रात्री १० वाजल्यानंतर रस्त्यांवरील सभा, प्रचार रॅली, वाहनांवरील प्रचार, ध्वनिक्षेपकांचा वापर, पत्रके वाटप तसेच घराघरांत संपर्क यावर पूर्णतः बंदी लागू होणार आहे. यासोबतच प्रचारासाठी लावलेले बॅनर, झेंडे, फलक व इतर साहित्यही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हटवावे लागणार आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष प्रचारावर बंदी असली तरी डिजिटल प्रचारावर नियंत्रण ठेवणे निवडणूक प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांतून पोस्ट, व्हिडिओ, रील्सच्या माध्यमातून प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या, तरी ऑनलाइन प्रचाराचा वेग रोखणे कठीण ठरत आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक पक्ष व उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार आज रात्री थांबणार असला, तरी डिजिटल पातळीवर हालचाली सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एकूण वातावरण सध्या दिसून येत आहे.
























