प्रतिनिधी | वलांडी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवणी तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे तापले आहे. महिला आरक्षणामुळे यंदा अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले असले, तरी महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र, उमेदवार महिला असल्या तरी प्रत्यक्ष प्रचार, नियोजन आणि राजकीय हालचालींमध्ये त्यांचे पतीच पुढे असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.
देवणी तालुक्यातील एकूण तीन जिल्हा परिषद गटांपैकी वलांडी हा गट सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे. तर जवळगा (सर्वसाधारण) बोरोळ हे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहेत. वलांडी जिल्हा परिषद गटासाठी चार महिला उमेदवार रिंगणात असून, जवळगा गटातून पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
पंचायत समिती अंतर्गत दवणहिप्परगा, तळेगाव, वलांडी, जवळगा, विळेगाव व बोरोळ असे एकूण सहा गण आहेत. या गणांमध्येही महिला उमेदवारांची संख्या मोठी असून प्रचाराची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी, पण मतदारांचा कौल कुणाकडे?
आरक्षणामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, प्रचारातील उत्साह, पतीराजांची भूमिका आणि पक्षीय ताकद यांचा मतदारांवर किती प्रभाव पडतो, हे मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.
वलांडी जिल्हा परिषद गटातील महिला उमेदवार—–
उषाताई पाटील – भाजप
अंजली बेळकोणे – काँग्रेस
जनाबाई बिरादार – शिंदे गट
मनीषा गायकवाड – वंचित बहुजन आघाडी
पंचायत समिती गणातील महिला उमेदवार——
दवणहिप्परगा :अंकिता पाटील – भाजप
प्रभावती पाटील – काँग्रेस
जवळगा : महादेवी पाटोळे – भाजप
मोरे अर्चना – अ प गट
सूरेखा सोनकांबळे – काँग्रेस
भाग्यश्री जिरे – वंचित
तळेगाव:प्रणिता चामले – काँग्रेस
अश्विनी हंचनाळे – भाजप
आरक्षण बदलाचा फटका कुणाला?
२०१७ च्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या एकाही उमेदवाराला यंदा संधी मिळालेली नाही. आरक्षण बदलल्याने मागील वेळच्या विजेत्यांना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले आहे. काही ठिकाणी पत्नीची जागा राखीव नसल्याने पतीने स्वतः उमेदवारी दाखल केली आहे, तर काही ठिकाणी मुख्य पक्षांचे कार्यकर्ते स्वतः निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना जागा महिलांसाठी राखीव झाल्याने पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीचे संपूर्ण नियोजन व प्रचाराची धुरा पतीच सांभाळताना दिसत आहेत.
प्रचारात महिलांचे चेहरे, नियोजन पुरुषांचे
निवडणुकीच्या रणधुमाळीत एक विरोधाभास प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचार फेऱ्या, बैठका, संपर्क दौरे, गट-तट सांभाळणे आणि रणनीती ठरवणे या सर्व बाबी पुरुषांच्या हाती आहेत, तर महिला उमेदवार बहुतांशी पोस्टर, बॅनर आणि व्यासपीठापुरत्याच मर्यादित असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिंदे गट व वंचित बहुजन आघाडी यांच्यात मुख्य लढत असून, अखेर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.
























