ज्येष्ठ साहित्यिकांच्या मार्गदर्शनामुळे नवतरुणांमध्ये साहित्याची आवड वाढली
वलांडी प्रतिनिधी : मुकेश कांबळे
देवणी तालुक्यातील वलांडी गाव आज संपूर्ण परिसरात सर्वाधिक साहित्यिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. परंपरा, विचार आणि शब्दशक्ती यांचा अनोखा संगम लाभलेल्या या गावाने हळूहळू साहित्य चळवळीचे केंद्र म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावात वर्षानुवर्षे साहित्यिक उपक्रमांची समृद्ध परंपरा जपली जात असून, ठरावीक कालावधीनुसार मुशायरा, कवी संमेलन, कविता वाचन, अभंग, भक्तीगीत, मिलाद कसीदे तसेच चर्चासत्रांचे सातत्याने आयोजन केले जाते.
या उपक्रमांमधून गावातील ज्येष्ठ व अनुभवी साहित्यिक आपल्या लेखनाचा, अनुभवांचा आणि जीवनदृष्टीचा मौलिक ठेवा नव्या पिढीसमोर मांडत आहेत. किसन महाराज, गफ्फार शाह मूर्शेद, कुमार धोत्रे सर, वाहेदसाब बौडीवाले, एफ. एम. सलीम आणि अजहर शेख या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे गावातील नवतरुणांमध्ये साहित्याबद्दलची आवड आणि जाणीव वाढीस लागली आहे.
ज्येष्ठ साहित्यिकांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने युवकांमध्ये कविता, कथा, गझल आणि लेखन क्षेत्रात उत्स्फूर्त सहभाग वाढताना दिसत आहे. अनेक नवोदित लेखक व कवी घडत असून वलांडीची साहित्यिक परंपरा अधिक समृद्ध होत आहे.
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, ही जाणीव वलांडीकरांमध्ये प्रकर्षाने दिसून येते. सामाजिक सलोखा, विचारस्वातंत्र्य आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य येथील साहित्यिक चळवळ करत आहे. त्यामुळे वलांडी गाव आज देवणी तालुक्याच्या सांस्कृतिक नकाशावर साहित्यिक विचारांचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक म्हणून मानाचे स्थान निर्माण करत आहे.
—कोट—-
“ज्येष्ठांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करीत आहोत. माझे गुरू आणि मला ज्यांना ऐकून लेखनाची प्रेरणा मिळाली ते राहत इंदोरी साहेब. त्यांना ऐकल्यानंतर ‘मीही लिहू शकतो’ असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि लेखनाला सुरुवात केली. ‘एहसासों का फलक’ हे पुस्तक लिहिले. नवीन पिढीत साहित्याबद्दल आवड आहे, मात्र लेखनासाठी अजून पुरेशी उत्सुकता दिसत नाही. पुढील काळात नवीन साहित्यिक घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
अजहर शेख (साहित्यिक, वलांडी)
गाव : वलांडी
लोकसंख्या : सुमारे ४,५००
साक्षरता : ८५ टक्के
अंतर : जिल्हाधिकारी कार्यालयापासून ६० किमी
कनेक्टिव्हिटी : निलंगा–उदगीर राज्य मार्गावर
प्रसिद्ध : गावातील सुसज्ज बाजारपेठ

























