वलांडी प्रतिनिधी
देवणी तालुक्यात मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र ( फिजीक्स)विषयाचा पहिला पेपर पार पडला.
विज्ञान शाखेत गुणांना विशेष महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कॉपीमुक्त राहावी, यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील १०१ परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, जिल्हा दक्ष पथकाच्या माध्यमातून सर्व केंद्रांवर दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कोणत्याही परीक्षा कक्षात संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखांना तत्काळ सूचना देऊन चौकशी व आवश्यक कारवाई केली जात आहे.
वर्षा घुगे-ठाकूर जिल्हाधिकारी यांनी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना स्पष्ट व कठोर सूचना दिल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा अनुचित प्रकार आढळून आल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.
वलांडी येथील श्री वेंकटेश महाविद्यालय येथे बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्र असून, केंद्रप्रमुख म्हणून भोसले यु. एम. हे शासनाच्या नियमावलीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडत आहेत. परीक्षा केंद्र क्रमांक ०६०७ वर एकूण ३२४ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ विद्यार्थी गैरहजर राहिल्याने ३२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या केंद्रावर १३ पर्यवेक्षक व २ सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बैठे पथक प्रमुख बालाजी केंद्रे (मंडळ अधिकारी), माधव सगर (ग्रामपंचायत अधिकारी), डी. डी. पवार (महसूल अधिकारी), साबणे एस. बी. (शिक्षण केंद्रप्रमुख), वजनम आर. आर. (साधन व्यक्ती) आदी अधिकारी उपस्थित होते. भरारी पथकात बिराजदार (सहाय्यक गटविकास अधिकारी, औसा) व साखरे ए. बी. (विस्तार अधिकारी, औसा) यांनी ठाण मांडून परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवली.
सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
























